ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवार निवड करताना भविष्यात होवू घातलेल्या व राजकीय प्रतिष्ठेची असलेल्या जिल्हा बॅंक निवडणुकीचा विचार करून संधी दिली; मात्र यामुळे भाजपच्या काही सदस्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. यातील उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी पदासह सदस्यपदाचा तर संजय देसाई यांनी सदस्यपदाचा राजिनामा देवून ही नाराजी जाहीर व्यक्त केली.
यानिमित्ताने भाजपमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली असून लॉरेन्स मान्येकर यांच्या समर्थकांनीही पक्षाच्या पदांचा राजिनामा देण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे जिल्हा बॅंक पूर्वतयारी भाजपला बूमरॅंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हापसेकर व देसाई यांची नाराजी दूर करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. ही शिष्टाई यशस्वी होईल, की नाही? हे दोन-चार दिवसांत स्पष्ट होणार आहे.
भाजपची सत्ता जिल्हा परिषदेवर आहे. भाजपकडे 31 संख्याबळ आहे. अध्यक्ष निवडीवेळी विरोधी शिवसेनेने सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते अपयशी ठरले. सभापती निवडीवेळी शिवसेनेने अर्जच दाखल केले नाहीत. शिवसेना अर्ज दाखल करेल या शक्यतेने भाजपने सर्व तालुक्यांना न्याय देत लॉरेन्स मान्येकर यांना उमेदवारी जवळपास निश्चित केली होती; परंतु शिवसेना उमेदवारी दाखल करीत नसल्याचे लक्षात येताच अंतिमक्षणी भाजपने जिल्हा बॅंकेचा विचार करीत जिल्हा बॅंक उपाध्यक्ष व सहकार क्षेत्रात चांगले स्थान असलेल्या राष्ट्रवादीचे दोडामार्ग नेते सुरेश दळवी यांच्या स्नुषा डॉ. अनिशा दळवी यांना संधी दिली.
जिल्हा परिषदे एवढीच जिल्हा बॅंकेची सत्ता महत्वाची असल्याने भविष्याचा वेध घेवून भाजप श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय योग्य होता; मात्र हा निर्णय भाजपच्या काही सदस्यांना पचनी पडला नाही. नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी एकदा शिक्षण व आरोग्य सभापती पद भूषविले आहे. पदावरुन उतरल्यावर त्यांनी शिक्षण विभागाच्या काही विषयासंदर्भात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली. आपले म्हणणे, सभा तसेच प्रसार माध्यमांमध्ये मांडले. तरीही त्यांना सभापतीपद मिळाले. त्यामुळे निष्ठावंत सदस्यांवर अन्याय झाल्याचे म्हणणे या सदस्यांचे आहे.
यातून उपाध्यक्ष म्हापसेकर, सदस्य संजय देसाई यांनी थेट जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजिनामा दिला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. शिवाय यापूर्वी राणे यांनी पदाधिकारी निवडीत अनेक धक्कादायक निर्णय घेतले होते. त्यावर नाराज होवून असा टोकाचा निर्णय कधी कोणी घेतला नव्हता; मात्र यावेळी तो घेतला गेल्याने राणे यांच्यासाठीही हा धक्काच आहे.
म्हापसेकरांची मनधरणी?
श्री. म्हापसेकर यांचा निर्णय भाजपच्या जिव्हारी लागणारा व मुळ भाजपच्या गोटाला हलविणारा आहे. म्हापसेकर यांनी राजिनामा दिला आहे. याशिवाय दोन जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वाक्षरीने राजीनामा दिला आहे. नियमात एकदा राजीनामा दिला तर तो मंजूर होतो; परंतु अध्यक्षा संजना सावंत यांनी सावध भूमिका घेत आपल्याकडे राजीनामे आलेले नाहीत, असे स्पष्ट केले आहे. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून म्हापसेकर यांची मनधरणी सुरू आहे. श्री. देसाई यांच्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यात वरिष्ठांना यश येते की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.
...तर भविष्यात परिणाम
30 मार्चला पशु संवर्धन समितीची मासिक सभा आहे. यावेळी म्हापसेकर अध्यक्षस्थानी दिसल्यास म्हापसेकर यांच्याबरोबर शिष्टाई यशस्वी झाली, असे म्हणावे लागेल. दोन्ही सदस्य राजीनाम्यावर ठाम राहिल्यास जिल्हा परिषदेत भाजपला धोका नाही; परंतु याचे परिणाम भविष्यात विविध निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील, अशी भीती आहे.
संपादन - राहुल पाटील
from Tajya news Feeds https://ift.tt/3dccoZs
via IFTTT
