पानगाव (सोलापूर) : गावातील तलाठी कार्यालयात कामाच्या दिवशीही हजर न राहणे आणि हजर नसल्यामुळे नागरिकांनी फोन केल्यास स्वत:चा फोन बंद करून ठेवणे, उडवाउडवीची उत्तरे देणे अशा तलाठ्याच्या विक्षिप्त कार्यपद्धतीमुळे गतवेळीचा दुष्काळ निधी आणि चालू हंगामातील अतिवृष्टीच्या अनुदानापासून बहुतांश शेतकरी आजही वंचित राहिलेले आहेत. गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद अल्प असल्यामुळे शेतकरी अनुदान निधीचे पूर्णपणे वाटप होत नसल्याचे चित्र दरवेळी दिसून येत आहे.
अनुदानाबाबतीत शासनाने नेमून दिलेले काम अर्थात लाभार्थी याद्या शासनाला उशिरा सादर करणे, सामान्य शेतकऱ्यांची अडवणूक करणे या कारनाम्यामुळे सुरवातीपासूनच वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या पानगाव येथील तलाठ्यामुळे येथील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. गतवेळीचा दुष्काळ निधी व चालू अतिवृष्टीचा निधी अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही शेतकरी आजही या अनुदानापासून वंचित आहेत. याचे प्रमुख कारण तलाठ्याची दिरंगाई आणि कामातील हलगर्जीपणा असल्याचे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तलाठी गावात जास्त येत नसल्याने अशा अडचणी मांडायच्या कोठे, हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. दरवेळी गावात गैरहजर असलेले "नॉट रिचेबल' तलाठी सामान्य नागरिकांना सतत मीटिंगचे कारण दाखवून वेळ मारून नेत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय अनुदानाच्या बाबतीत लाभार्थींच्या याद्या उशिरा तयार करणे, तयार झालेल्या यादीत लाभार्थींचे बॅंक खाते क्रमांक काळजीपूर्वक न टाकता चुकीचे भरणे असे गंभीर प्रकार कार्यालयात घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी तलाठ्याच्या अशा वर्तणुकीमुळे पानगावच्या तत्कालीन सरपंचांनी बार्शी तहसीलकडे तक्रार केली होती. परंतु त्यांच्या कामकाज पद्धतीत कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. त्यांच्या अशा मनमानीपणाला व कामातील हलगर्जीपणाला कंटाळून वैतागलेले ग्रामस्थ त्यांची चौकशी करून त्यांची बदली करण्याची रीतसर मागणी अर्जाद्वारे प्रांताधिकारी सोलापूर यांच्याकडे करणार आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
from Tajya news Feeds https://ift.tt/3crQDFL
via IFTTT
