नागपूर : कबुत्तरबाजीतून उद्भवलेला वाद विकोपाला जाऊन युवकाची धारदार शस्त्राने सपासप वार करीत हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवारी रात्री गिट्टीखदान हद्दीतील गवळीपुरा भागात घडली. मृताच्या बहिणीच्या डोळ्या देखतच आरोपीने घाव घातले. अक्षय बागडे (२५) असे मृताचे तर राजा ऊर्फ अरमान ऊर्फ अजहर जाफर शेख (२७) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि राजा हे दोघेही डोंगरे आटाचक्कीजवळील गवळीपुऱ्यात शेजारी-शेजारीच राहतात. दोघांनीही कबुतरं पाळली असून, सतत त्यातच गुंतून असतात. कबुतरांच्या शर्यतीवर ते पैसे लावायचे. यावरूनच त्यांच्यात नेहमीच खटके उडत असायचे. अक्षय हा खासगी ड्रायव्हर असून, अनेक दिवसांपासून घरीच होता. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास अक्षय हा राजाच्या घरासमोरून जात असताना दोघेही आमोरासमोर आले आणि वादाची ठिणगी पडली.
अधिक माहितीसाठी - ...अन् नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी, हिरव्या मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा
वाद विकोपाला जाऊन आपसात हाणामारी सुरू झाली. राजा अक्षयला मारत असल्याचे बघून भाचीने अक्षयची बहीण रोषणी रॉबीन साळवे (३१) हिला घटनेची माहिती दिली. लागलीच रोशनी तिथे पोहोचली. तिने भावाला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपी व मृत ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते. संतापलेला राजा घरात शिरला चाकूसारखे शस्त्र बाहेर घेऊन आला आणि अक्षयच्या छातीवर सपासप वार केले.
उघड्या डोळ्यांनी भावावर झालेल्या हल्ल्यामुळे रोषणीसुद्दा घाबरली. बहिणीने शेजाऱ्यांच्या मदतीने भावाला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले. परंतु, तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
http://dlvr.it/RwVTxF

