हल्ली आपला मोबाईल फोन ‘टॅप’ होतो, शिवाय अनेक गोष्टींवर कोणीतरी सतत वॉच ठेवून असते, याची मनोजला खात्री वाटू लागली आहे. आपण कोणाशी बोललो, किती वेळ बोललो आणि काय बोललो, याच्या इत्थंभूत माहिती कोणीतरी अपरोक्ष मिळवत असल्याचा त्याला संशय आहे. फेसबुकवर कोणाला लाईक करतो, कोणाला कमेंट देतो. व्हॉटसअपवर कोणाबरोबर चॅटिंग करतो, याबाबत त्याच्यावर ‘विरोधी पक्ष’ बारकाईने लक्ष ठेवू लागला. पण दिवसभरात एक जीबी डेटा संपवण्याचे त्याचे ‘टार्गेट’ असल्याने त्याने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्याच्यावर फारच आरोप झाल्याने याबाबत तो काळजी घेऊ लागला. त्यामुळे त्याने मैत्रिणींची नावे प्लंबर, वायरमन, कडक इस्त्री, रॉंग नंबर, रद्दीवाला, मनीमाऊ या नावाने सेव्ह केली. त्यामुळे तो बिनधास्त झालो. पण प्लंबर व रद्दीवाल्याबरोबर आपला नवरा तास-तासभर रोज काय बोलतो, याचा त्याच्या बायकोला संशय आला. त्यामुळे तिने मनोज बाथरूमला गेला असताना ‘प्लंबर’ या नावाने सेव्ह असलेल्या नंबरवर फोन केला. ‘‘काय रे आज सकाळीच कशी आठवण काढलीस? बायको काय माहेरी गेली काय’’? अशी पलीकडून गोड आवाजात विचारणा झाल्याने मनोजच्या बायकोचा राग अनावर झाला. तरीही शांतपणे ती म्हणाली,
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
‘आमच्या घरातील ड्रेनेजचा पाइप फुटलाय. दुरुस्तीला लवकर या’’? असे सांगितले. त्यावर पलीकडील गोड आवाज एकदम तिखट झाला. ‘‘कोण बोलतंय? मी काय तुम्हाला प्लंबर वाटले काय? ’ अशी रागाने विचारणा केली. मग बायकोने आपली सगळी माहिती तिला दिली. ‘तुमचा नंबर ‘प्लंबर’ या नावाने सेव्ह असल्याने मी फोन केला, अशी माहिती दिली. त्यावर त्या गोड आवाजाने रागाने फोन ठेवून दिला. मनोज अंघोळ करून आल्यानंतर बायकोने याचा जाब विचारला. ‘तुमच्या सर्व गैरप्रकारांची माहिती मी पेनड्रायव्हमध्ये साठवून ठेवलीय. तुमच्याविरोधातील सगळे पुरावे मी बाबांना देणार आहे, असे म्हणून त्याची बिनपाण्याने केली. शिवाय त्याच्यावरील आरोपांचे लेखी पत्रही तिने मनोजला पाठवले. त्यात ‘टार्गेट’चा उल्लेख केल्याने मनोज चांगलाच धास्तावला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्यानंतर त्या गोड आवाजाने दुपारी मनोजची पुन्हा खरडपट्टी काढली व त्याला ब्लॉक करून टाकले. घरी आल्यानंतर बायकोच्या मनात सकाळचा राग होता. मनोजला तिने चहाच काय पण पाणीही दिले नाही. ‘‘अगं, मी तसा नाही. माझं मन सोज्वळ आहे,’’ असे बोलून त्याने बाजू सावरून धरली. मात्र, ‘तुमच्या गैरवागणुकीचे माझ्याकडे गाडीभर पुरावे आहेत’, अशी बायकोने धमकी दिली. त्यानंतर ती मनोजवर सातत्याने वॉच ठेवू लागल्याने त्याने सगळी टोपणनावे डिलिट केली. फेसबुक, व्हॉटसअप बंद करून टाकले. कोणाचा फोन आला तर एक- दोन मिनिटांशिवाय तो बोलेनासा झाला. सगळे चॅटिंग बंद केले. त्यामुळे रात्रीची जागरणेही कमी झाली. सकाळी लवकर तो उठू लागला. त्यामुळे दिवसभर फ्रेश राहू लागला. पूर्वी दिवसभरात तो किमान दहा तास मोबाईलवर घालवायचा. आता सगळा मिळून पंधरा मिनिटांपेक्षा मोबाईलला तो वेळ देत नाही.
आता तो बायकोच्या कामातील चुका काढू लागला आहे. स्वयंपाकात लक्ष घालू लागला आहे. एखादा पदार्थ कसा करायला हवा, याबाबतचा सल्ला तो बायकोला देऊ लागला आहे. रोज नव्या नव्या पदार्थांची आॅडर तो सोडू लागला आहे. तसेच घर कसं स्वच्छ आणि नेटनेटके असावे, यावर तो बायकोला तास- तासभर लेक्चर देऊ लागला आहे.
Edited By - Prashant Patil
from Tajya news Feeds https://ift.tt/2PB8jWo
via IFTTT
