पुणे - लष्कर व कोंढवा परिसरात राहणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या, कामगारांच्या वर्षानुवर्षे उदरनिर्वाहाचे प्रमुख हक्काचे ठिकाण म्हणजे ‘फॅशन स्ट्रीट’. एक-दोन नव्हे, तर तब्बल अडीच हजार जण आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे ८ ते १० हजार जणांचे जगणे त्या एकट्या बाजारपेठेवर अवलंबून होते. पण, शुक्रवारी लागलेल्या आगीत केवळ बाजारपेठच जळून खाक झाली नाही, तर त्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांच्या तोंडचा घासही हिरावून घेतला गेला. ‘अब खायेंगे क्या, और जियेंगे कैसे भाई’ हे ताहिर शेख या तरुण विक्रेत्याचे काळजाला अक्षरशः चिरणारे शब्द या घटनेची दाहकता स्पष्ट करतात.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महात्मा गांधी रस्त्यावरील (एमजी रोड) फॅशन स्ट्रीटमध्ये खरेदीसाठी पुण्याबरोबरच बाहेरच्या तरुण ग्राहकांची सर्वाधिक पसंती होती. एमजी रोडवर बसणाऱ्या विक्रेत्यांचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने २००० मध्ये अंतर्गत भागात सध्याच्या ‘फॅशन स्ट्रीट’मध्ये स्थलांतरित केले. कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने, चामडी व गृहपयोगी वस्तू अशा विविध प्रकारची दुकाने व स्टॉल्सनी ही बाजारपेठ गजबजली. मार्च २०२० मध्ये लॉकडाउन सुरू झाला. त्यानंतर इतर व्यवसायांप्रमाणेच इथल्या व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ पोचली. ही झळ सहन करीत काहींनी घरातील सोने गहाण ठेवून, तर काहींनी कर्ज काढून पुन्हा व्यवसायाला सुरूवात केली. तीन महिन्यांपासून व्यवसाय चांगला चालू लागला होता. त्यातच पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याची धाकधूक विक्रेत्यांमध्ये होती. त्यातच शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फॅशन स्ट्रीटला आग लागली. त्या आगीबरोबरच तेथील विक्रेते, कामगारांचे जगणेही अक्षरशः रस्त्यावर आले.
पुणे : अग्निशमनदलातील पदं भरतीला वेग येणार का?; तीन वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित
लॉकडाउनचा मोठा फटका बसल्यानंतर अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ताहिर शेख व त्याचा मित्र झिशान कुरेशी यांनी स्वतःच्या घरातील सोने गहाण ठेवून सात लाख रुपयांचे कपडे घेऊन आपला स्टॉल सुरू केला होता. विक्रीच्या पैशातून ते कर्जाचा हप्ता फेडत होते. परंतु आगीमध्ये त्यांचे दुकान जळाले. त्याचप्रमाणे बाबाजान बिलेरीची चार दुकाने, नावेद कुरेशीची दोन दुकाने, मुनाफ कुरेशी यांची चार दुकाने अशी अनेकांची दुकाने, स्टॉल्स जळून खाक झाली. ‘‘जेब में फुटी कौडी नहीं, अब खायेंगे क्या, और जियेंगे कैसे’’, असा सवाल करीत ताहीर त्याच्या जळालेल्या दुकानाकडे बघत राहिला.
या आगीमध्ये विक्रेत्यांचा लाखो रुपयांचा माल खाक झाला. जळालेल्या दुकानांमध्ये आता विक्रेत्यांच्या वस्तुंची केवळ भिजलेली राख, तुटलेले पत्रे, आडवे-तिडवे पडलेल्या पाईपांशिवाय काहीच दिसत नव्हते. दोन ते अडीच तासानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
महावितरणचा अजब कारभार; बील भरूनही तोडले वीज कनेक्शन
किमान ८० कोटी रुपयांचे नुकसान
फॅशन स्ट्रीटमध्ये ८०० हून अधिक दुकाने, स्टॉल्स आहेत. प्रत्येक दुकानात किमान पाच लाखांपासून ३० लाख रुपयांपर्यंतचा माल ठेवला जातो. त्यामुळे या आगीमध्ये किमान ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता नावेद कुरेशी या विक्रेत्याने व्यक्त केली आहे. आगीमध्ये किती रुपयांचे नुकसान झाले, याबाबत आत्ताच सांगता येणार नसल्याचे अग्निशामक दलाने स्पष्ट केले
कशामुळे लागली आग?
आग नेमकी कशामुळे लागली, याचे उत्तर अग्निशामक दलाकडून देण्यात आले नाही. संपूर्ण फॅशन स्ट्रीटला विद्युतपुरवठा करणारा मुख्य स्वीच रात्री १० वाजता बंद केला जातो. त्यामुळे शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता नाही. रात्री १०.३० वाजता पाठीमागील गेट क्रमांक ३ जवळील एका बंद दुकानातून धूर येत असल्याचे तेथील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने विक्रेत्यांना सांगितले, असे विक्रेते सांगतात; तर संबंधित आग ही शॉर्टसर्किटमुळेच लागली असण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली आहे.
Edited By - Prashant Patil
from Tajya news Feeds https://ift.tt/39m2jIe
via IFTTT
